निर्दोष घोटाळा!
निर्दोष घोटाळा ! देशाच्या अर्थकारणालाच नाही तर राजकारणालाही कलाटणी देण्यास कारणीभूत ठरलेला 2 जी स्पेक्ट्रम घोटाळा प्रकरणातील आरोपी माजी मंत्री ए. राजा यांच्यासह सर्व १९ आरोपींची निर्दोष मुक्तता करण्याचा निर्णय सीबीआयच्या विशेष न्यायालयाने दिला आहे. देशात घडलेल्या एकंदर गैरव्यव्हारापैकी 2 जी स्पेक्ट्रम चा गैरव्यवहार सर्वात मोठा समजला जात होता. ‘कॅग’सारख्या संस्थांनी तर यात एक लाख ७० हजार कोटी रुपयांचे सरकारी नुकसान झाल्याचे अहवाल दिले होते. प्रकरणाचे गांभीर्य लक्षात घेऊन सर्वोच्च न्यायालयाने प्रकरणाचा तपास करण्याचा आदेश सीबीआय ला दिला. यात माजी मंत्री राजा, द्रमुक नेते करुणानिधींची कन्या खासदार कनिमोळी व १९ जणांना अटक करून तुरुंगात टाकण्यात आले. घोटाळ्याच्या आकडेवारीच्या कथा एवढ्या मोठ्या सांगण्यात आल्याने सहाजिकच यात राजकीय आरोप-प्रत्यारोपाचे अनेक अंक बघायला मिळाले. यूपीए-२ सरकारच्या पतनास कारणीभूत ठरलेल्या अनेक कारणांपैकी स्पेक्ट्रम घोटाळा हे मुख्य कारण ठरले. कारण या घोटाळ्यानंतर देशात युपीए सरकारची मोठी बदनामी झाली. समाजसेवक अण्णा हजारे यांना भ्रष्टाचाराविरोधात आंदोलन करावे वाटले.