बेभान झुंडींचे बळी
बेभान झुंडींचे बळी आधुनिक शिक्षण, मिळालेले ज्ञान आणि आत्मसात केलेल्या बुद्धीच्या जोरावर आजचा माणूस प्रगत आणि संवेदनशील झाला असल्याचे समजले जात असले तरी, या पृथ्वीतलावर असणाऱ्या इतरांप्रमाणे माणूस हा सुद्धा एक प्राणीच असल्याने त्याच्यातील उपजत प्राणी गुणधर्म अद्यापही नष्ट झाले नसल्याचे सभोवताली घडणाऱ्या घटनांवरून समोर येत आहे. माणूस हा तसा समाजशील. पण, प्राण्यांच्या कळपाची प्रवृत्ती माणसातही तितकीच ठासून भरलेली आहे. या प्रवृत्तीला पोषक एकादा प्रसंग समोर आला की माणसातील सुशिक्षितपणा आणि सामाजिकता अलगदपणे गळून पडते. व त्याची मूळ रानटी वृत्ती ज्वालामुखीसारखी उफाळून येते.आणि बेफाम झालेला माणसाचा हा झुंड मग हिंसेचा कडेलोट करतो. पालघर जिल्ह्यातील कासा पोलिस ठाण्याच्या हद्दीतील गडचिंचले गावाजवळ जमावाकडून घडलेल्या अमानुष हत्याकांडातही अशाच हिंस्त्र 'कळपप्रवृत्तीचे' प्रत्यंतर आले. चोर-दरोडेखोरांच्या अफवेमुळे बेभान झालेल्या जमावाने चोर समजून दोन साधू आणि वाहन चालकाची निर्घृणपणे हत्या केली. कळपाच्या किंव्हा झुंडीच्या वृत्तीला ना विवेक असतो ना विचार. त्यांना ढोबळ गोष्टी तेवढ्या समजतात